२०२० मोहीम, जानेवारी २ रा किल्ला - "चावंड" एक आडवाटेचा किल्ला


२०२० च्या "१२ महीने २४ किल्ले" या मोहिमेची सुरुवात शिवनेरी किल्यावरील शिवाई देवीच्या आशीर्वादाने आणि शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर नतमस्तक होऊन २५ जानेवारी रोजी झाली.

या वर्षीच्या मोहीमे अंतर्गत जमेल तसं एखाद्या आडवाटेवरील किल्ल्याला (सहसा कोणी करत नाही असा ) भेट द्यावी अशी कल्पना मनात आली. त्यामागे दोन हेतूआहेत :-
पहिला हेतू म्हणजे - माझ्या लिखाणाद्वारे असे किल्ले आणि त्याचे वर्णन आवडल्यास नक्कीच दुर्गप्रेमी अशा स्थळांना भेटी देऊ शकतील.
दुसरा हेतू म्हणजे - दुर्ग प्रेमींच्या भेटी वाढल्यास अशा किल्यांच्या पायथ्याला असलेल्या गावात या न त्या कारणाने रोजगार निर्मिती देखील होऊशकेल.
या विचारांमुळे आम्ही चावंड या किल्याची निवड शिवनेरी सोबत केली. एकाच दिवशी "चावंड " म्हणजेच "प्रसन्नगड" हा आडवाटेवरील किल्ला आणि "जीवधन" असे हे दोनही किल्ले २६ जानेवारी २०२० या अनोख्या दिवशी करायचं ठरवलं.
चढाई करताना थंड वातावरणाचा आनंद घेताना आम्ही माय लेकी 
चावंड गाव!! भरपूर पाणी आणि लहान लहान वाड्यांनी व्याप्त असणारा , रंगीबेरंगी कौलारु घरांनी नटलेला असा हा भूभाग खूपच मोहक ! जलदेवतेचा वरदहस्त असल्यामुळे एकंदर जुन्नर हरितमय वाटलं. जुन्नरच्या चावंड किल्याजवळचा संपूर्ण परिसर जानेवारीतील थंड वातावरणामुळे अल्लाहदायीवाटत होता. गुलाबी थंडीचा आनंद घेत गाडी किल्याच्या पायथ्याशी आली. आजुबाजुला अजिबात एकही हॉटेल नाही ना एकही टपरी. या किल्याला भेट द्यायची असल्यास सर्व शिधा आणि पाणी सोबत बाळगलेले उत्तम.
चावंड किल्याकडे पायथ्या पासून पाहिल्यास त्याचा दिसणारा एकंदर विस्तार आणि उभारी पाहून किल्ला नक्की चढता येईल का? अशी शंका माझ्या मनात आली देखील. मात्र, व्यवस्थित असलेल्या पायऱ्या आणि लोखंडी रेलिंगमुळे सुरक्षितपणे जाता आलं.
सुरक्षित पायऱ्या आणि रेलिंग मुळे चढाई सहज होते. 
रौद्र आणि भव्य अशा या ग्रिरीदुर्ग च एका वाक्यात वर्णन.  किल्याची उंची,रचना आणि विस्तार यांमुळे या  किल्याचा उपयोग केवळ टेहळणीसाठी होत असावा असे वाटते. साधारण १५० -१७० पायऱ्या चढून वर पोहचेपर्यंत माझ्या पायाला चांगलेच गोळेआले होते. चढाई करताना समोर दिसणारे धरणाचे पाणी आणि आजूबाजूची जुन्नरची हिरवळ डोळ्यांना सुखावत होती.

पायऱ्या चढताना मध्ये अत्यंत अरुंद अशी वाट लागली. अगदी लहानशी, म्हणजे एका वेळी एक व्यक्ती आणि त्या एका व्यक्तीच एकच पाऊल तिथे ठेवता येईल इतकीशी ती वाट! क्षणभर वाटले कि मी वाटेत स्वानंदीच्या बॅगेसकट अडकेलच. मात्र आमच्या सोबत असलेल्या रोहीत या मित्राने पावलोपावली मार्गर्शन केले आणि अवघड वाट सोपी करून दिली. स्वतःला आणि पाठीवरील स्वानंदी व तिच्या बॅगेला वेगवेगळ्या रितीने अगदी सावधरीत्या आडवं-तिडवं करून पाच पावलांचा पहिला थरारक असा तो टप्पा पार केला. मागे वळून पाहिलं तेव्हा पाण्याच्या डोहांच्या दिशेकडुन आलेल्या वाऱ्याच्या थंड झुळुकीने माझा घाम पुसला आणि हसत हसत स्वागत देखील केले. सोबत आदिनाथ आणि रोहित हे संपूर्ण वाटेवर माझे मार्गदर्शक होते.
पायऱ्यांचा शेवटचा टप्पा - "मला पण किल्ला स्वतः चढायचा " अशी म्हणणारी स्वानंदी अवघड टप्पे हळूहळू सर करायला लागली आहे. 

कोवळ्या उन्हाचा आनंद वेगळाच आहे आणि त्यात समोरच चित्रात रेखाटल्याप्रमाणे असलेले पाण्याचे स्रोत 
सजवलेली तोफ आणि सजवलेले प्रवेशद्वार 
पायऱ्या संपल्यावर अखेर फुलांनी सजवलेला पहिला दरवाजा गाठला. २६ जानेवारी निमित्त तिथे सरकारी अधिकार्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालेले होते. केशरी झेंडूच्या माळांमुळे किल्याचे संपूर्ण रुपडे पालटले होते. तिथे असलेली एक तोफ देखील अतिशय सुंदरीत्या सजवली होती. दुर्गप्रेमीमुळे जकाल अशा ऐतिहासिक पुराव्यांना नव्याने सन्मान मिळत आहे हे पाहून खरोखरच समाधान वाटते.

संपूर्ण प्रवासात पूर्वेला असलेला उभ्या कातळामुळे उन्ह डोक्यावर आले तरी फार जाणवले नाही. अशा या वातावरणात संपूर्ण किल्ला पाहायला अजिबात त्रास झाला नाही. वाळलेल्या-पिवळ्या पडलेल्या गवतातून चालताना काहीशी काळजी घेऊन आम्ही भराभर पुढे सरकत होतो.


सपाट भूभागावर स्वानंदी देखील भरपूर चालते. किल्ला पाहायला पायवाटा देखील सहज सापडतात.त्यामुळे इथे हरवण्याची अशी काही भीती नाही. चावंड किल्ल्याचे वैशिष्टय म्हणजे - तुडुंब पाण्याने भरलेल्या सात टाक्यांचा समूह! तसेच वेळ काढून आणि किल्याबद्ल माहिती वाचून गेल्यास नक्कीच हा किल्ला वेगळा भासतो.
सात टाक्यांपैकी एक टाके आणि त्या समोरील नक्षीकाम केलेली दगडी कमान. 
बऱ्यापैकी मोठं असं हे पाण्याचं टाक (पुष्करणी) पाहण्यासाठी किल्याच्या डाव्या बाजूस आम्ही काही अंतर चालुन गेलो. एका टाकी समोर सुबक अशी कोरीव कमान पाहायला मिळाली. एक क्षण हंपीचीच आठवण झाली. अथांग निळ्या आकाशाखाली पाण्याची टाकी पाहताना बरं वाटलं. या सप्त टाक्यांचा समूह पाहून एक लक्षात आलं कि मराठी साम्राज्यात बांधलेला किल्ला, मग तो भले टेहळणीचा का असेना त्या मागे नक्कीच दूरदर्शी विचार होते.

किल्यावर वाड्यांचे काहीसे अवशेष पाहावयास मिळाले. तसेच शिवकालीन स्वच्छतागृहे, पाण्याची व्यवस्था आणि काही मंदिरांचे अवशेष पाहण्यासारखे आहेत.

चतुर्भुज  चावंडामातेचे छोटेखानी रचनेत असलेले मंदिर 
राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजाचा मंदिरासमोर सन्मान !
सर्व ठिकाण पाहून अखेर आम्ही चावंड मातेच्या दर्शनासाठी मंदिरात पोहचलो. किल्याचे शेवटचे टोक असही म्हणता येईल. इथेच नक्षीदार सुबक कोरीव काम असलेले तोरण देखील पाहायला मिळाले. मंदिरात चतुर्भुजा देवीचे दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या आडोश्यालाच गारव्याला बसलो,आराम केला आणि जराशी पोटपूजा सुद्धा केली. मातेच्या आशीर्वादाने आणि २६ जानेवारीच्या औचित्य साधुन स्वानंदीसह या ठिकाणी आम्ही सर्वानी राष्ट्रगीत गाऊन राष्ट्रध्वजालाअभिवादन देखील केले .

रोहीत या आमच्या गिर्यारोहक मित्राने चावंडाच्या माथ्यावरून आजूबाजूला असलेले - शिवनेरी, हडसर,निमगिरी या किल्यांचे दर्शन घडविले. त्याचप्रमाणे या किल्ल्यावरून माणिकडोहचे निळेशार पाण्याने मन मोहून घेतलं.

अडीच - तीन तासात  व्यवस्थितरीत्या किल्ला पाहून झाल्यावर आम्ही पुन्हा एकदा त्या पायऱ्यांच्या वाटेवरून गड उतरायला लागलो. स्वानंदीला घेऊन चढण्यापेक्षा उतरताना खरा कस लागतो. मात्र, तीच आहे जिच्यासाठी आणि जिच्यामुळे आज मी महाराष्ट्र दर्शन करत आहे आणि इतिहासाला खऱ्या अर्थाने समजून घेत आहे.

माझे विचार आणि प्रवासवर्णन आवडले असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना,नातेवाईकांना हा लेखआवश्यक नक्की शेअर करा.
जुन्नरमधील शिवनेरी ला दिलेली अविस्मरणीय भेट या विषयी चा  २०२० मोहीम, जानेवारी किल्ला १ ला - शिवनेरी हा लेख आवर्जून वाचा. 

Comments