राजमाची ! चढला तो जिंकला !!!

जून महिना आला कि कागदावर  माझी लिस्ट तयार होते.  ती म्हणजे  या पावसाळ्यात फिरायला कुठे कुठे जायच याची . त्यातील माझा एक आवडत ठिकाण ते म्हणजे "राजमाची", हे माझच नाही तर पुणेकरांचा आवडत ठिकाण आहे . राजमाची म्हणजे पुणेकरांचा typical trekking destination. वर्षातून २ वेळा म्हणजे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात भेट देऊ शकता असा हा निसर्गरम्य राजमाचीचा पट्टा.  दोन्ही ऋतूत या ठिकाणाच सौंदर्य ते वेगळाच. ठिकाण जरी एक असल तरी ऋतू नुसार त्यात नाविन्य असत.
पावसाळ्यातील राजमाचीचे वर्णन करावे कितके कमीच आहे . आम्ही मागच्या वर्षी पावसाळ्यातच राजमाचीला गेलो होतो . साधारण लोनावाल्या पासून १५ किलोमीटरवर असून काही अंतरापर्यंत आम्ही गाडीने जाऊ शकलो. इथे मिळेल त्या जागी स्वतःची गाडी स्वतःच्या जबाबदारीवर पार्क करूनच पुढे जावे लागते . राजमाची ट्रेक ३ प्रकारे करता येतो .
१. वाटेत असणाऱ्या तुंगार्ली धरणाच्या काठावर  (back water) संध्याकाळी पोहचावे . रात्री तिथेच तंबू ठोकून मस्त तळ्याकाठी कॅम्पिंग करून सकाळी राजमाचीकडे प्रस्थान करवे.

तुंगार्ली चा परिसर 
थंडीत तर हे ठिकाण फारच लोभस वाटते (सप्टेंबर ते जानेवारी ). या ठिकाणच्या समोरील टेकडीवर चढून गेल्यास फारच सुंदर असे दृश्य दिसते ते म्हणजे संपूर्ण धरणाचा रमणीय परिसर. हिवाळ्यात कोवळ्या उन्हाची मज्जा घेण्यासाठी यासारखं दुरसं ठिकाण नाही .
डोंगरावरून दिसणार्या  धरणाचे दृश 
२. साधरण दुपारी ३-४ च्या सुमारास ट्रेक चालू करावा. अंधार पडायच्या आत राजमाचीच्या पायथ्याला असणाऱ्या भैरवाच्या मंदिरात  मुक्कामी पोहचावे . तीन चार दगडांची चूल मांडून चुलीवरच्या जेवणाचा आनंद घ्यावा आणि  सकाळी सकाळी  मुख्य किल्ल्याकडे जायला निघावे .
३. एक दिवसाच्या परतीचा प्रवास.
आम्ही सकाळी लवकरच लोणावळ्याला पोहोचलो . लोणावळ्यातील HDFC  बँकेलगतचाच रस्ता आपल्याला राजमचीकडे नेतो त्यामुळे आम्ही ही तोच रस्ता पकडला. रस्त्यावरील दगड- धोंडे  ,खड्डे ,चढ -उतार याची  मज्जा लुटत साधारण ५ किलोमीटर अंतर गाडीनेच पार केले. जाता जाताच डोंगराच्या कुशीत वसलेले लोणावळा शहर नजरेस पडले. सुंदर ,टूमदार असे बंगले आपल लक्ष्य वेधून घेतात.काही वेळ का होईना पण आंम्ही सगळे बंगले आपण नीट पहिले.
लोणावळा शहर आणि सुंदर बंगले
 साधारण १  तासांनी आम्ही  तुंगार्ली धरणावर पोहोचलो. जरावेळ विश्रांती  घ्यावी असा परिसर.
पुढे  अंदाजे पाऊन तास आपल्याला लहान पायवाटेवरून जाव लागत. एकीकडे दरी आणि दुसरीकडे डोंगर अशी हि वाट. पुढे लगेचच फार सुंदर रमणीय अस चित्र  होत. दोन्ही बाजूला उंच डोंगर, त्यावरून खाली जमिनीवर वाहत येणारे लहान- मोठे धबधबे आपल्याला  वेगळ्याच जगात घेऊन जातात .
हि सुद्धा कॅम्पिंग करण्यायोग्य अशी जागा आहे. याच रस्त्यांनी पुढे राजमाचीकडे जाता येते. काही अंतर चालून गेल्यावर आम्हाला राजमचीकडे जाण्याची  योग्य दिशा दाखवणारा बोर्ड  दिसला आणि आमच्या जीवात जीव आला.
दिशा दाखवणारा बोर्ड
कारण पहिल्यांदा जाणार्यांना माहीत नसत कि आपण बरोबर चाललो आहोत कि नाही ते .  या फाट्यावरून जो रस्ता सुरु होतो तो जंगलातून जाणारा कच्चा रस्ता असून खड्डे ,चिक्खल , लहान-मोठे साप , विंचू , खेकडे आणि दाट झाडे यांचे दर्शन घडवणारा असा आहे . अंदाजे २ किलोमीटरचा प्रवासाचा हा टप्पा जरासा कठीण असून इथे डोळे उघडे ठेउनच चालावे लागते . जंगल जरा घनदाट असल्याने सकाळी ११ वाजता सुद्धा संध्याकाळचे ५-६ वाजल्या सारखे वाटत होते.वाटेतच  एक मोठा खळखळणारा ओहोळ लागला. उंच डोंगरांवरून वाहत आलेला हे पाणी अतिशय स्वछ आणि मधुर होत. ज्याला आपण Mineral  Water म्हणतो. इतका छान वाहत पाणी पाहुन त्यांत एक डुबकी मारल्याशिवाय पुढे जायची इच्छा होत नाही आणि आम्ही सुद्धा  आमचा मोह आवरला नाही.
ओहोळ
काही वेळ का होईना पण आम्ही त्या पाण्यात मनसोक्त डुंबलो, पोहोलो. अश्या पाण्यात चिंब भिजल्यावरच  वर्षा विहार म्हणजे काय हे समजत. जरा आवरत घेऊन आम्ही तिथून निघालो कारण वेळेत राजमाचीवर पोहचायचं होत आणि तितकच अंतर पुन्हा परत  यायचं ही होत.  जरासा चढ चढून गेल्यावर राजमाचीच्या बुरुजांचे आणि तटबंदी चे दर्शन झाले त्यानंतर राजमाचीवर कधी पोहचणार अस सारखा सारखा वाटू लागल. रस्त्यातच डाव्या हाताला आम्हाला एक चहाची टपरी लागली आणि त्याच्या समोरच होता तो म्हणजे राजमाचीचा प्रसिद्ध धबधबा . ज्याची एक झलक पाहण्यासाठी इतकी पायपीट करावी लागली. ते निसर्गाचा वरदान जेव्हा आपण डोळ्यांनी पाहतो तेव्हा सगळ काही विसरायला होत. प्रचंड उंचावरून पडणारा शुभ्र असा धबधबा पाहून 'अरे काय रे हे'!; 'किती सुंदर '!, 'वाव ! 'आईशप्पथ !' असे मराठीतील अनेक असतील नसतील ते सगळे उद्गार कळत -नकळत आपल्या तोंडून बाहेर पडतात.
विलोभनीय असा दृश पाहून काही क्षण का होईना पण मला तरी स्वतःचा विसर पडला. खूप दूर आणि आकाराने मोठ्या असणार्या या धबधब्याचा आवाज कानाला खूप गोड वाटत होता . आपल्या दुर्देवाने आपल्याला  धबधब्यात उतरण्याची  सोय नाही.  संपूर्ण  प्रवासात इथ पर्यंत कुठेही चहाची टपरी नाही . हा नजरा पाहता पाहता चहा आणि कोळशावर भाजलेल कोवळ कणीस खाण्याची  मज्जा ही औरच!. एक गोष्ट मला इथे आवर्जून नमूद करावीशी वाटते ते म्हणजे इथे मिळणारा चहा हा फक्त ५ रुपयांचा आहे. रोज इतके अंतर पार करून , पडणाऱ्या रपरप पावसाचा मारा सहन करून देखील इथले स्थानिक लोक दुर्गप्रेमींसाठी अगदी योग्य माफक किमतीत चहा उपलब्ध करून देतात आणि आपला उदरनिर्वाह चालवतात . खरंच कौतुक करण्यासारख आहे हे सार .
हिरवेगार डोंगर आणि कोसळणारा धबधबा असा हे नयनरम्य दृश आपल्याला राजमाचीवर जाईपर्यंत दिसत राहत. जाता जाता आपल्याला अनेक विविध रंगी पक्षी ,फुलपाखरे आणि माकड सुद्धा पाहायला मिळतात. आपल्यासारखच
ती  सुद्धा वर्षाविहाराचा आनंद घेत असतात. वाऱ्यावर उडत असतात ,डोलत असतात ,येणाऱ्या-जाणार्याचे स्वागत पण करत असतात . पावसात गारठून गेलेल्या माकडांचा असाच एक सुंदर क्लिक मला इथे मिळाला .साधारण २०-२५ मिनिटांमध्ये आम्ही राजमाचीच्या पायथ्याला पोहोचलो. तिथे भैरोबाचे लहान मंदिर आहे . रात्री मुक्कामाची वेळ आलीच तर या मंदिराच्या आडोश्याला तुम्ही विसावा घेऊ शकता . मंदिराच्या समोरच्याच बाजूला दोन दिपस्थंभ आहेत. अनेक उन्हाळे ,पावसाळे सहन केल्यामुळे त्यांची आता झीज झाली आहे . तसेच काही लहान दगडी मुर्त्या भग्नावस्थेत आहेत .
दिपस्तंभ  आणि काही मूर्तीचे अवशेष 
 मंदिरात देवाचे  दर्शन घेऊन आम्ही राजमाचीच्या मुख्य वाटेकडे लागलो. बऱ्यापैकी लहान आणि चढ असलेली अशी वाट पार कारायला  १०-१५ मिनिटे लागली. हीच वाट आपल्याला  मुख्य प्रवेश द्वाराकडे घेऊन जाते  आणि राजमाचीवर पोहचवते. काही वेळ आपल्याला वाटत कि आपण राजमाचीवरच  आलो आहोत , पण तस नसत अजून बराच पल्ला  गाठायचा बाकी  असतो.
राजमाची 
किल्यावर पोहचताच तिथे एक कुंड  आहे.त्या समोरील बाजूस नजर टाकताच क्षणी हिरव्यागार डोंगररांगा दिसतात.राजमाचीचा परिसर तसा बराच मोठा आहे . दूर दूर पर्यंत पसरलेले हिरवे गवताचे गालिचे आणि त्यावरील पावसाचे तुषार अगदी डोळ्यात भरण्यासारखे असतात . त्या लुसलुशीत हिरव्या गवतावर मी मस्त लोळले, झोपले, भरपूर आनंद घेतला . काय करणार इतका हिरवागार गवत कधीतरीच पाहायला मिळत ना !!

 गडावर अनेक लहान-मोठी डबकी आहेत. कधी गेलात तर डबक्यात पाय टाकून आवश्यक बसा . डबक्यातील छोटे छोटे मासे पायाला गुदगुल्या करून जातात. या प्रकाराला "Fish Therapy म्हणतात .फारच मजेशीर असा अनुभव असतो . त्यामुळे कि काय पण थकवा जरा कमी व्हायला  मदत झाली होती .थोडा पुढे चालून गेल्यावर मागे वळून पहिल तेव्हा कोसळणारा धबधबा आणखीनच सुंदर दिसत होता. येणारे- जाणारे पावसाचे ढग त्याच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत होते. मी तर ढगातच होते. अनुभवत होते निसर्ग, वारा आणि त्यातील गारवा .


चोहुबाजुकडे पसरलेली हिरवळ आणि त्यात पावसात भिजलेली ,काळ्याकुट्ट दगडांची राजमाची नुसताच बघत बसावे असा हे दिमाखदार रुप.  खरच हे सार बघुन तुम्हाला सुद्धा जिंकल्यासारख वाटेल.
वातावारातील थंडावा आणि उत्साह यामुळे १५ किलोमीटर अंतर चालून देखील आपल्याला थकवा जाणवत नाही कारण निसर्ग वेळोवेळी आपली काळजी घेत असतो. जरावेळ आराम करून , जेवून , इकडे तिकडे फिरून आम्ही परतीचा मार्ग धरला . इच्छा नसताना सुद्धा परतावे लागत होते म्हणून माझ मन जरा नाराज होत . मी मागे वळून स्वतःशी ठरवल कि पुढच्या वर्षी सुद्धा नक्कीच येणार भेट द्यायला.

Comments

Post a Comment